Sunday, September 13, 2015

॥ गणपती बाप्पा मोरया ॥


"नारायण, नारायण" असा जप करत नारदमुनी गजाननाकडं आले. दोन हातात दोन छोटे ब्रश आणि सोंडेत एक मोठा ब्रश. एक सुंदर निसर्गचित्र रंगवण्यात दंग होते श्रीगणेश. पृथ्वीतलावर सातत्यानं ये-जा करणार्‍या मोजक्या देवांपैकी श्रीगणेश एक. आपण जाऊ तिथला परिसर सुंदर बनवायचा त्यांचा आग्रह. हिरव्या-पिवळ्या रंगांची मुक्त उधळण केली होती त्या चित्रात. आता हे चित्र पूर्ण झालं की पृथ्वीवरच्या नक्की कुठल्या भागात बसवलं जाईल, या विचारात नारदमुनी गढून गेले. इतक्यात गणेशाचं त्यांच्याकडं लक्ष गेलं.

"प्रणाम मुनीवर, कसं काय येणं केलंत?" सगळे ब्रश बाजूला ठेवत गणेशानं नारदमुनींना विचारलं.

"नारायण, नारायण," भानावर येत नारदमुनी म्हणाले, "गणेशदेवा, तुझे भक्तगण तुझ्या स्वागताच्या जय्यत तयारीला लागलेले पाहून, तुला चार गोष्टी सांगायला आलोय."

"बोला मुनीवर, काही गडबड तर नाही ना?"

"गडबड म्हणजे...तसं नवीन काही नाही, पण..."

"पण? पण काय नारदमुनी?"

"पण हेच की तिकडच्या सगळ्या जुन्या समस्या अजूनही आहेत तशाच आहेत. नव्हे, उलट त्यांचं स्वरुप अधिकच गंभीर होत चाललंय..."

"परिस्थिती खूपच वाईट आहे का मुनीवर?"

"गणेशा, दर चतुर्थीला भक्तगण तुला साकडं घालतात, त्यांच्या समस्या सोडवायचं. शिवाय वर्षभर तुझ्या मंदीरांमधून नवस, आरत्या, महापूजा, अभिषेक, हे सारं सुरु असतंच. झालंच तर, वर्षातून एकदा तू स्वतः जाऊन तिकडं राहून येतोस काही दिवस. तरीही लोकांच्या समस्यांना काही अंत दिसत नाही बघ."

"कुठल्या समस्यांबद्दल बोलताय तुम्ही?" गणेशानं अदबीनं विचारलं.

"कुठल्या कुठल्या समस्या सांगू गजानना?
- महागाईनं जनसामान्यांचं कंबरडं मोडलंय;
- जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडलेत;
- भ्रष्टाचारानं अर्थव्यवस्था मोडकळीला आलीय;
- दहशतवादानं माणसा-माणसातल्या विश्वासाचा बळी घेतलाय;
- देशाच्या...."

"थांबा थांबा मुनीवर," गजाननानं नारदमुनींना थांबवत म्हटलं, "अहो या सगळ्या समस्या माणसानंच निर्माण केल्यात की नाही?"

"हो, मग?"

"अहो मग या सगळ्या समस्यांवरचे उपाय माणसाकडंच असायला पाहिजेत की नाही?"

"हो, बरोबर आहे तुझं म्हणणं, पण..."

"मग कसला पण घेऊन बसलात मुनीवर? ते सगळे उपाय स्वतःच्या घरी ठेऊन माणसं माझ्याकडं येतात, फक्त समस्या घेऊन. मग उपास-तापास, नवस-सायास, होम-हवन, मंत्र-अभिषेक हे सगळं करत बसतात. आता तुम्हीच सांगा, त्यांनी निर्माण केलेल्या समस्यांवर मी कसा काय उपाय काढणार बरं?"

"हं, तेही बरोबरच आहे म्हणा. पण तरी या समस्यांवर काही तरी केलं पाहिजेच ना? म्हणजे, दहशतवादावर, महागाईवर, भ्रष्टाचारावर,..."

"बास बास बास...अहो काय नारदमुनी, माणसांमध्ये फिरुन तुम्हीपण माणसांसारखं कुरकुरायला लागलात की हो. त्या माणसांच्या समस्या-बिमस्या सोडा माणसांवर. त्यांनी स्वतः शोधलेले उपायच त्यांना कायमचं तारु शकतील. तुम्ही आम्ही भरवलेला घास पचायचा नाही त्यांना. त्यापेक्षा मी तुम्हाला मोदक भरवतो, तो खा आणि संतुष्ट मनानं नारायणाचा जप करा," एवढं बोलून श्रीगणेशानं आतल्या बाजूला आवाज दिला, "मोदक घेतलेत का बनवायला? नारदमुनींना द्या जरा गरम-गरम..."

आणि मग....

.................

....मग काय, आम्ही घेतले की हो मोदक बनवायला! आणि बनवतोच आहोत - खूप खूप, भरपूर. तुम्हालाही खायचे असतील तर जरुर सांगा आम्हाला. त्याचं काय आहे, श्रीगणेशानं आम्हाला सांगितलंय, "हे जग खूप सुंदर आहे, त्याला अजून सुंदर बनवायचं आपण!"

ते चित्रसुद्धा आता पूर्ण होत आलंय. श्रावण-सरींनी सजवलेल्या आजूबाजूच्या हिरव्यागार निसर्गचित्राचा खरा चित्रकार येतोय आपली भूक शमवायला. तो गणाधिपती गजानन भुकेला आहे भक्तीचा, भावाचा, प्रेमाचा,....आणि स्वादिष्ट मोदकांचाही! लागायचं मग तयारीला? आम्ही तर केव्हाचे तयार होऊन बसलोय वाट बघत... विघ्नहर्त्या गणरायाची आणि तुमची. कधी येताय मोदक खायला?

"उंदीर म्हणाला बाप्पांना
दर्शन देऊया भक्तांना,
मोदक-लाडू खाऊया
गणपती बाप्पा मोरया!!!"

No comments:

Post a Comment